महाराष्ट्र ग्रामीण

वर्षावासानिमित्त नगर कळंब येथे भंते बुद्धघोष यांचे धम्मप्रवचन-ता. 29 ऑगस्ट, जिल्हा प्रतिनिधी – अलीशा तांबोळी, रिपब्लिक व्हॉईस इंडिया

नगर कळंब येथे शनिवार, दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी वर्षावासानिमित्त धम्मप्रवचनाचे आयोजन करण्यात आले. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या काळातील आहार-विहार कसा असावा, मनुष्याने कुशल कर्म करून पुण्य संपादन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन भंते बुद्धघोष यांनी केले.

प्रवचनादरम्यान त्यांनी आजच्या तरुण पिढीबद्दल खंत व्यक्त केली. समाजातील अनेक तरुण व्यसनाच्या गर्तेत सापडले असून, महिलाही रमाईच्या नावावर घरकुल घेत असल्या तरी घरात रमाईचा फोटो न लावता इतर देवदेवतांचे फोटो लावतात, असे त्यांनी नमूद केले. मोबाईलच्या अतिवापरामुळे आईवडील व पालक आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे आणि संस्कारांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

भंते बुद्धघोष यांनी स्वतःच्या जीवनातील अनुभवही सांगितला. मातोश्रींच्या निधनानंतर केवळ अंत्यसंस्कार व रक्षाविसर्जनासाठी दोन दिवस उपस्थित राहून उर्वरित काळात विविध गावांत प्रवचन देत त्यांनी समाजाला वर्षावासाचे आणि आहार-विहाराचे महत्त्व पटवून दिले.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे धाराशिव जिल्हा संस्कार सचिव लक्ष्मण धावारे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी “डी.जे. आणि डॉल्बी या नावाने समाजात उभा राहिलेला राक्षस तरुणांना नाचवतो आहे. आजचा तरुण नाचणारा होणार की वाचणारा? जसा तू होशील, तसाच तुझा मुलगाही होईल” अशा शब्दांत व्यसनाधीन व दिशाहीन तरुणांना फटकारले.

याच कार्यक्रमात नगरसेवक अमर (अण्णा) गायकवाड यांचे चिरंजीव इंद्रसेन यांच्या आठव्या वाढदिवसानिमित्त धम्मदेशना देऊन समाजाचा आदर्श नागरिक बनावा अशी मंगलकामना व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे शहर सचिव मारुती दादा गायकवाड, निलेश गांजीकर, धीरज गायकवाड, मुकेश गायकवाड, नितीन गायकवाड, प्रेमकुमार गायकवाड, बापूराव जोगदंड, रुपेश गायकवाड, सौ. शितल श्याम गायकवाड, बेबी गायकवाड, रमाबाई गायकवाड, प्रतिभा हौसलमल, पुनम गायकवाड, ठाणा आंबिरेताई, करुणा गायकवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन लक्ष्मण धावारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button